दुचाकी पुलावरून कोसळून बीड जिल्ह्यातील दोघे ठार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 21, 2009 AT 11:45 PM (IST)
सिरसाळा - दुचाकी पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वारासह दोघे जागीच ठार झाले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वांगी (ता. परळी वैजनाथ) येथील माजी सरपंच दिलीप दशरथ जाधव (वय 35) यांनी नवीन दुचाकी खरेदी केली होती. शनिवारी (ता. 21) सकाळी साडेअकराच्या सुमारास सिरसाळा येथून ते गणपत भोपा राठोड (वय 50, रा. वांगी) यांना सोबत घेऊन भरधाव निघाले असताना तपोवन शिवारात पुलाच्या कठड्यावर ती आदळून नाल्यात कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच तपोवन ग्रामस्थांनी दोघांनाही सिरसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख हबीब तपास करीत आहेत.