जग बदलण्याची ताकद "आई'मध्येच - उत्तम कांबळे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 21, 2009 AT 12:00 AM (IST)
सिन्नर - जगाच्या इतिहासात आई नावाची संस्था अडचणीत आली आहे. आईची पात्रता प्रेम, स्नेह, तिचे दूध ही आहे. मात्र आज बाईला आई होण्याची लाज वाटत आहे. जग बदलायची ताकद आईमध्ये आहे, मात्र जन्माला येण्यापूर्वीच देशात मुली मारण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे, अशी खंत "सकाळ माध्यम समूहा'चे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांनी येथे व्यक्त केली.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या 37 व्या ग्रंथालय सप्ताहात "आई' या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह किशोर गुजराथी, संचालक राजेंद्र देशपांडे, पुंजाभाऊ सांगळे, पी. एल. देशपांडे आदी उपस्थित होते. स्वर्गीय नर्मदाबाई गणपतराव भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री. देशपांडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
श्री. कांबळे म्हणाले, की आई ही वस्तू नसून मूल्य आहे, ती बदलता येत नाही. मात्र आज काळजातून अन् फ्लॅटमधूनच ती हद्दपार होत आहे. जग बदलायचे असेल तर आईनेच बंड करायला पाहिजे. आई ही सामर्थ्यशाली संस्था आहे. जगातल्या महासत्तेवर मात करत असते. आई दोन पिढ्यांचे पाहत असते. ती कुठेही असली तरी तिच्यामध्ये मुलांबद्दल प्रेम, जिव्हाळा असतो. तिची तुलना कधीही होऊ शकत नाही. तिच्यामध्ये झुंज देण्याची ताकद असते. आईला जात नसते, ती धर्मनिरपेक्ष असते. ती जातीच्या पलीकडे आहे. भाषा बदलत जाईल परंतु ती बदलणार नाही. असे सांगत त्यांनी आपल्या आईविषयी प्रेमभाव व्यक्त केला. श्री. देशपांडे यांनी आभार मानले.