मी सगळ्या प्रकारचे अप्पे करते. रव्याचे अप्पे, किवीचे अप्पे, मनुकांचे अप्पे, आंब्याचे अप्पे, सीताफळाचे अप्पे... गोड अप्पे तर असतातच, पण काही जणांना गोड आवडत नाही, म्हणून त्यांच्या सांगण्यावरून तिखट-मिठाचे अप्पेही मी करते. तेही वेगवेगळ्या पद्धतीने... कर्नाटकी, कोकणी... खरं तर अप्पे करायला वेळ लागत नाही, फक्त तयारीला वेळ लागतो. कित्येक वेळा दोनेक तासांत सव्वाशे ते दीडशे अप्पे मी एकटीने केले आहेत.
असे हे हात बसलेले अप्पे करण्याचा घाट एकदा मात्र मी घातला आणि तो पुरता फसला. पहिल्यांदाच पाहुणे येणार होते, म्हणून मी अप्पे करणार होते. नेहमीप्रमाणे सगळी तयारी केली आणि पाहुणे यायच्या थोडी आधी अप्पे करायला बसले. पण...
मी जे करत होते, त्याचा आकार अप्प्याचा होता, पण नेहमी होतो तसा अप्पा हलका होत नव्हता. आतून ढोकळ्यासारखा मोकळा होतो, तसा होत नव्हता. चहाबरोबर तिखट-मिठाचे अप्पे छान लागतील म्हणून मी ते डबाभर केले होते. पहिल्यांदाच पाहुणे येणार, त्यांना आता काय द्यायचं? माझा मूडच गेला.
डोकं जरा भणभणलं म्हणून चहा घ्यावासा वाटला. डोक्यात विचार चालूच होते. चहा संपता संपताच एक छान गोष्ट सुचली...
अप्प्यांचे तुकडे करून ते मिक्सरमधून काढले. एका कढईत तेल घेऊन राई, जिरे, हिंग, किंचित हळद, कढीपत्ता व कांदा बारीक चिरून घालून चांगला परतला. नंतर टॉमेटो बारीक चिरून घातला. अप्प्यांत तांदूळ आणि डाळी, तिखट, मीठ, आलं, मिरची, खोबरं सर्व घातलं होतंच. त्यामुळे मी जास्त काही घातलं नाही. झालेल्या पदार्थाच्या वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, शेव घालू या असं मी ठरवलं. पाहुण्यांसोबत लहान मुलं होती. मुलांना सजवून दिलं तर आवडीने खातात.
मी मग बाऊलमध्ये खोबरं, कोथिंबीर, शेव आणि काजू घातले. त्यावर आप्प्यांचा परतलेला चुरा (रवाळ) दाबून त्याची मूद पाडून दिली. सर्वांना बघूनच पदार्थ आवडला. परंतु मी बिघडलेल्याची सुधारलेली पाककृती, असं अजिबात बोलले नाही.
सगळे गेल्यावर मी विचार करायला लागले, काय चुकलं? आणि लक्षात आलं, मी थोडा फ्रुट सॉल्ट घालायला विसरले होते. त्यामुळे घोटाळा झाला.
पट्टीच्या सुगरणीचाही एखादा पदार्थ बिघडतो. पण बिघडला म्हणून हातपाय गाळून बसण्यात काय अर्थ? तो सुधारला आणि सगळ्यांना आवडला, यातच तर कौशल्य! एखादा पदार्थ बिघडला म्हणून फुकट जाऊ न देता त्याचाच दुसरा सुंदर खाण्यासारखा पदार्थ तयार करते, तीच घरची सुगरण!!
- सुनीता शेंडे, गोरेगाव