यवतमाळ - शिवसेनेने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा वळविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याचे परिणाम मुंबईतही भोगावे लागतील. दुसरीकडे वैधानिक विकास महांमडळाला मुदतवाढ देऊन शासन या आंदोलनात खोडा घालण्याचे काम करीत आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विदर्भ राज्य संग्राम समितीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला. येथील विश्रामगृहात सोमवारी (ता. 18) त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार जांबुवंतराव धोटे, माजी खासदार उत्तमराव पाटील, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार, माजी आमदार विजयाताई धोटे, विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, क्रांती धोटे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपत आली आहे, तरीही शासन त्या महामंडळाला मुदतवाढ देऊन विदर्भाच्या आंदोलनात खोडा घालण्याचे काम करीत आहे. शिवसेनेने आपली भूमिका बदलायला हवी. विदर्भातील सेनेच्याच पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांचे वेगळ्या विदर्भाबाबतचे मत घेण्यासाठी सेनेने एक पथक येथे पाठविले आहे, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
संचारबंदी लागल्यानंतर जशी परिस्थिती असते. तीच परिस्थिती 20 जानेवारीला दिसून येईल. चेंबर ऑफ कॉमर्ससह सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भासाठी पाठिंबा दिला आहे. जांबुवंतराव धोटे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भूमिका बदलावी, असे आवाहन करून स्वतंत्र विदर्भाची कास धरावी, असे ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शिवसैनिकांचेच मत घ्यावे, नंतर आम्हाला सांगावे. मात्र विदर्भ राज्य संग्राम समितीतील कुठलाही नेता त्यांना भेटायला जाणार नाही, असे श्री. धोटे म्हणाले.
राजाभाऊ ठाकरे म्हणाले, यवतमाळ येथे शिवसेनेच्या फलकाला काळे फासले गेले. तेव्हा हा बंद केवळ विदर्भातच झाला. महाराष्ट्रात का झाला नाही, असा प्रश्न केला. आतातरी नागरिकांनी शिवसेनेला ओळखायला हवे, असेही ते म्हणाले. उत्तमराव पाटील म्हणाले, 20 जानेवारीला विदर्भ पूर्ण बंद राहील, त्यासाठी नागरिकांची तयारी झाली आहे. आता विदर्भाच्या विकासासाठी वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही.
मनमोहनसिंग, सोनिया, शरद पवारांना भेटणार20 जानेवारीनंतरचा दुसरा टप्पा थेट पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी व शरद पवार यांना भेटण्याचा असेल. ही भेट 26 जानेवारीला घेतली जाईल. त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली तर प्रश्नच नाही. मात्र, विरोधात चर्चा झाली तर त्वरित विदर्भ राज्य संग्राम समिती आपला निर्णय घेईल व पुढील रूपरेषा ठरेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.