कथांच्या माध्यमातून चांगली मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 25, 2010 AT 12:50 AM (IST)
पुणे - ''माणसातील माणूसपण जपण्याबरोबरच त्याचे जगणे अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न "मोगरा फुलला' या पुस्तकाच्या लेखनातून जाणवतो. कथांच्या माध्यमातून चांगली मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे,'' असे मत "सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
अनुराधा प्रकाशनच्या वतीने मारुती यादव यांनी लिहिलेल्या "मोगरा फुलला' या कथासंग्रहाचे प्रकाशन पाध्ये यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मारुती यादव व प्रकाशिका अनुराधा यादव या वेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. डॉ. प्र. ल. गावडे अध्यक्षस्थानी होते. पाध्ये म्हणाले, ""कथांच्या माध्यमातून अनेक चांगली मूल्ये सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. यादव यांचे लेखन प्रवाही आणि वाचकाला विश्वासात घेऊन काही नवे सांगणारे आहे.'' डॉ. जोशी म्हणाले, ""यादव यांच्या कथांचा दर्जा पाहता भविष्यात ते मराठी साहित्यातील दिग्गज कथाकारांच्या रांगेत जाऊन बसले तर नवल वाटणार नाही. कथाकार, कथाकथनकार व कवी अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या यादव यांच्याकडून आणखी चांगल्या लेखनाची अपेक्षा आहे.''
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. गावडे म्हणाले, ""कथांच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांची मांडणी यादव यांनी केली आहे. सामाजिक बांधिकलकीबरोबरच माणुसकीची शिकवण देणाऱ्या उत्तम कथा या पुस्तकात आहेत.''
अनुराधा यादव व मारुती यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले; तसेच आभार मानले.