
नवी दिल्ली - मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी केवळ झाकी उर रेहमान लखवीविरुद्धच खटला सुरू आहे. इतर सूत्रधारांची नावे सर्वांना माहीत असूनही पाकिस्तान त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. त्यामुळे पाकिस्तान या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात चालढकल करत असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकेल, असे आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी केला.
मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी नुकतेच म्हटले होते. लखवीसह सात जणांवर पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, चिदंबरम यांनी वरील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ""लखवी हा केवळ एक सूत्रधार आहे, इतरही सूत्रधारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांची नावे माहीत असूनही पाकिस्तानने त्यांच्यावर कारवाई न केल्यास ते या दहशतवाद्यांना अभय देत आहेत, असा निष्कर्ष निघू शकेल.'' "जमात उद दावा'चा म्होरक्या हाफीज सईदविरोधात कोणतेही खटले दाखल नाहीत. त्याच्याविरोधात कारवाई करण्याची भारताची मागणी आहे. तसेच, या खटल्यांमध्ये सहभागी असणाऱ्या सरकारी संस्थांची नावे सांगण्यासाठीही भारताने दबाव आणला आहे