
मुंबई - ''पद्म पुरस्कार मिळण्याबाबत मी व्यक्त केलेल्या मनोगतावर कवी ना. धों. महानोर यांनी "सकाळ'मध्ये केलेले भाष्य वाचून मी निरुत्तर झालो आहे. त्यांनी जे काही लिहिले, त्यावर मी काही बोलण्यापेक्षा, माझ्यावर, माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच बोलणे योग्य ठरेल,'' अशी भावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
संगमनेर येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात पाडगावकर यांनी भारत सरकारचा पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेची निस्सीम सेवा करूनही अद्याप शासनाने दखल न घेतल्याची बोचही पाडगावकरांनी या वेळी बोलून दाखवली होती. हे पुरस्कार कसे मिळतात, हेदेखील आपल्याला माहीत असल्याचे विधानही त्यांनी या वेळी केले होते.
पाडगावकर यांनी पद्म पुरस्कारांबाबत व्यक्त केलेल्या मनोगतावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करणारा महानोर यांचा लेख "लाचावले मन, लागलीसे गोडी' या शीर्षकाखाली आज (ता. 4) "सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायची, असा प्रतिप्रश्न पाडगावकरांनी केला आहे.
---------------------------------------------
''ऐंशीव्या वर्षीही मी गावोगावी कवितांचे कार्यक्रम करतो ते कवितेच्या प्रेमापोटी अन् तीवर असणाऱ्या निस्सीम श्रद्धेमुळेच. त्यात चूक ती काय? या विषयावर आपणास अधिक काहीही बोलायचे नाही.''
- मंगेश पाडगावकर
---------------------------------------------