पुणे - ""महाराष्ट्राच्या उभारणीत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा वाटा असून, त्यांच्या विचारांचा हा वारसा नव्या पिढीने पुढे चालविला पाहिजे,'' अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी व्यक्त केली.

प्रतिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या वसंत केशव पाटील व विठ्ठल पाटील संपादित "यशवंतराव ः विचार आणि वारसा' या पुस्तकाचे प्रकाशन सुळे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या.
प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे, अरुण पारगावकर आणि वसंत केशव पाटील या वेळी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ""चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा इतका मोठा आहे, की महाराष्ट्राच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातही प हिली आठवण त्यांचीच येते. आता अमृत महोत्सवी महाराष्ट्राचा विचार करण्याची वेळ आली असून, पुढील काळासाठीही त्यांचा वारसाच महाराष्ट्र ाला पुढे नेणार आहे. शिक्षण, आरोग्य, महिलांची स्थिती अशा क्षेत्रांबाबत त्यांचे विचार पाहिले, तर ते किती द्रष्टे आणि पुरोगामी होते, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. त्यांनी जाणीवपूर्वक नवी पिढी घडविली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्याच पिढीतून आले आहेत. त्यांच्या लेखनातून संवेदनशीलता आणि विशाल दृष्टीचा प्रत्यय येतो. राज्य-भाषा यामध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व कधीही मर्यादित राहिले नाही.''
त्या म्हणाल्या, ""शिक्षण आणि चांगली मूल्ये हे चव्हाण साहेबांच्या विचारांचे वैशिष्ट्य होते. सत्ता-पैसा आज आहे, उद्या नसेल, पण ही मूल्ये कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, यावर ते ठाम होते. त्यांचा वारसा साऱ्या महाराष्ट्राला लाभला आहे,''
शिंदे म्हणाले, ""यशवंतराव चव्हाण हे सत्ताभिलाषी नव्हे, तर सत्याभिलाषी व्यक्तिमत्त्व होते. सत्ता, आयुष्य आणि आसपासच्या साऱ्या पर्यावरणाला त्यांनी अत्यंत सुंदरपणे समजावून घेतले होते. ते अत्यंत निरपेक्ष, निःस्पृह आणि कमालीच्या उंचीचे व्यक्तिमत्त्व होते.'' पारगावकर यांनी प्रास्ताविक केले.