
कोदामेंढी - येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचे परीक्षा केंद्र मौदा येथे हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज रस्त्यावर जाळपोळ करून निषेध केला.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे बारावीचे परीक्षा केंद्र आहे. अचानक ते केंद्र मौदा येथे हलविण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होणार आहे. येथील परीक्षा केंद्र सुरळीत सुरू असताना शिक्षण विभागाने हा संतापजनक प्रकार केला. या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले. आज सकाळी दहा वाजता 500 वर विद्यार्थी रस्त्यावर आले. रस्त्यावर जाळपोळ करून त्यांनी कोदामेंढी येथे परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी धर्मापुरी येथे परीक्षा केंद्र होते. ते केंद्र आता 35 किलोमीटर अंतरावरील मौदा येथे नेण्यात आले. विद्यार्थ्यांना जाण्या-येण्याचा मोठा त्रास होणार आहे. या परीक्षा केंद्रावर खात, धर्मापुरी, रेवराल, निमखेडा येथील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतात. निमखेडा येथील विद्यार्थ्यांना मौदा येथे परीक्षा केंद्र जवळचे आहे. परंतु, त्यांना लांब असलेले धर्मापुरी केंद्र देण्यात आले. तर कोदामेंढी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना कोदामेंढी केंद्र जवळचे होते. आता त्यांना मौदा येथे परीक्षा केंद्र देण्यात आले. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
शुभांजी धनरे, अंशुला बावनकुळे, शिल्पा भोस्कर, प्रशांत गजभिये, सलमान पठाण, सलीम झडीये, विनोद दुनेदार, प्रफुल्ल डोकरीमारे, स्नेहा गजभिये, कैलास देवतारे, दीपिका गोणेकर, रीना भलावी, प्रियंका मनगटे, आकाश भिवगडे, विलास हेडाऊ, प्रणाली तांदूळकर, वैशाली ढोमणे, जयश्री लांजेवार, सोनम हेडाऊ, प्राजक्ता विकटे, अशोक नाटकर, अनुप हटवार, अजय चवरे, ज्योती पुडके, सरिता चौकारी, रीना काट, अतुल काठोके, अनिकेत कुकडे या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात पालकांनीही आंदोलनामध्ये भाग घेतला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शुभमताई बावनकुळे, सरपंच प्रकाश मेश्राम, उपसरपंच भगवान बावनकुळे, पंचायत समिती सदस्य अशोक हटवार, शैलेश वाघमारे, सुभाष बावनकुळे, अमोल गोकुर्ले यांनी आंदोलनामध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करू, असा इशारा दिला.
अधिकाऱ्यांनी काय साधले
कोदामेंढी येथील बारावीचे परीक्षा केंद्र 35 किलोमीटरवरील मौदा येथे हलविण्यात आले आहे. अधिकारी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, असे सांगत असतात. परंतु, कोंदामेंढी येथील परीक्षा केंद्र दुसरीकडे हलवून अधिकाऱ्यांनी काय साधण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पालक करीत आहे. 35 किलोमीटर जाणे-येणे करून विद्यार्थी पेपरमध्ये काय लिहिणार, असा सवालही पालकवर्गाने केला आहे.