व्यक्तिद्वेषी, समाजविरोधी धिंगाण्याला ठाम विरोध
कोल्हापूर - वृत्तपत्राचे काम असते समाजाला पुढे नेण्याचे, दिशा देण्याचे, चांगले घडविण्याचे. याउलट एखादे वृत्तपत्र तथाकथित "मार्केट लीडरशिप'च्या आवरणाखाली समाजाला मागे खेचणारी आणि मटक्या-गुटख्यासारख्या मोहात अडकविणारी भूमिका घेत असेल आणि तरीही "पुढारी'पणाचा दावा करीत असेल, तर त्याला विरोध करायलाच हवा. "हम करे सो...' वृत्तीने गेली काही दशके कोल्हापुरात सुरू असलेला धिंगाणा आता बस्स झाला. हा धिंगाणा आणि "पुढारी'पणाचा अट्टहास मोडून काढण्याचा निर्धार "सकाळ'ने केला आहे.
कोल्हापूरची जनता साक्षीला आहे. "पुढारी'ने पत्रकारितेला आणि वाचकांच्या स्वातंत्र्याला हरताळ फासणारे किती प्रयोग कुठल्या थराला जाऊन केले. वृत्तपत्रांनी समाजातल्या चांगुलपणाला बळ द्यावे, अंधश्रद्धा मोडून काढाव्यात, काही परंपरा, विचारधारा पाळाव्यात, ही अपेक्षा असते. तिला मातीत घालण्याचे काम रोज आपण अनुभवत आहोत. वृत्तपत्रांची स्पर्धा आज सुरू झाली आहे आणि या स्पर्धेत उभे राहण्याची आणि जिंकण्याची धमक "सकाळ'मध्ये आहे. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढायची "सकाळ'ला गरज नाही. मुद्दा वृत्तपत्रांच्या स्पर्धेचा नाही आणि विक्रेत्यांच्या सुरू असलेल्या बहिष्काराचाही नाही. त्याचा समाचार वाचकच घेत आहेत. मुद्दा समाजाच्या व्यापक हिताचा आहे, वाचकांच्या स्वातंत्र्याचा आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराला रोखण्याचा आहे. वाचकांनी आज "सकाळ'ऐवजी घरात टाकलेला पुढारी विक्रेत्यांना परत देऊन पुढारीच्या दादागिरीला "कोल्हापुरी झटका' दिला आहे. कोल्हापूरकर या दादागिरीला का कंटाळले, त्यालाही एक कारण परंपरा आहे. म्हणूनच वाचकांचा हक्क अबाधित राखण्यासाठी "सकाळ' या लढाईत उतरला आहे.
काय घडविले "पुढारी'ने आणि काय बिघडविले, याचा लेखाजोखा कधीतरी मांडायलाच हवा. कोल्हापुरात सूर्यही आमच्याच परवानगीने उगवला पाहिजे, हा उद्दामपणा राजर्षी शाहूंच्या विचारांवर पोसलेल्या मर्दांच्या नगरीत किती काळ चालू द्यायचा, यालाही मर्यादा आहेत. सुरवात करूया मटक्यापासून. मटका हा रोग आहे. समाज नासवणारी कीड आहे. तरीही रोज तो छापणारच आणि त्या आकड्यांच्या जिवावर खपाचे आकडे फुगविणार, हा अट्टहास किती काळ पाहायचा? मटक्याने अनेकांची घरे, संसार उद्ध्वस्त केले. अनेकांना आत्महत्येच्या आत्मनाशी मार्गावर आणून सोडले. तरीही मटका छापणारच, असा अट्टहास करणाऱ्या दैनिकाला आपल्या घराच्या उंबऱ्याच्या आत येऊ द्यायचे की नाही, हा मुद्दा आहे. जे मटक्याचे तेच गुटख्याचे. "सकाळ'ने ना कधी मटका छापला, ना गुटख्याचा पुरस्कार केला. "पुढारी'पणा करणाऱ्या वृत्तपत्राचे मात्र त्याशिवाय पाऊलही पुढे पडत नाही.
ताठ मानेच्या आणि कण्याच्या पत्रकारितेला धंदेवाईकतेचे ग्रहण कोणी लावले, ते या कोल्हापुरात वेगळे सांगायला नको. निवडणुकांतच नव्हे तर वर्षभर हाच धंद्याचा मार्ग बनविणारे असे वृत्तपत्र जगाच्या पाठीवर कुठे नसावे. विरोध आहे तो या सवंगपणाला.
माझे ऐकत नाही त्याला मोडून काढू. त्याला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करू, असली टोकाची व्यक्तिद्वेषी भूमिका मांडण्याला आणि त्याला प्रतिष्ठा देण्याला "सकाळ'चा विरोध आहे. दाखले अनेक आहेत. शिवाजी विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांच्या विरोधात रान पेटविण्याचा "प्रताप' घडविण्यामागचे मूळ कारण काय? हे सारेच जाणतात. केवळ मुलाची परीक्षेची बैठक व्यवस्था बदलली नाही, यासाठी साऱ्या समाजाला वेठीस धरले गेले नव्हते काय? कोल्हापूरचा महापौरही मीच ठरविणार. एखाद्या गावचा सरपंचही मीच ठरविणार आणि आमदार-खासदार कोणी व्हायचे, हेही मीच ठरविणार, ही लोकशाहीलाच चूड लावणारी भूमिका किती काळ पाहत राहायची? ज्यांचा समर्थाघरचे श्वान असा उद्धार केला, तेच अचानक सर्व प्रकारच्या गुणांचा समुच्चय असल्याचे या वृत्तपत्राला कसे वाटू शकते. कोलांटउड्या मारण्याचे यापेक्षा वेगळे उदाहरण कुठले असेल? खासगी स्वरूपाच्या वादातून एका होतकरू नगरसेवक तरुणाला महापौर होऊ द्यायचेच नाही यासाठी भाऊसिंगजी रोडवरून झालेला आटापिटा कोल्हापूर विसरलेले नाही. या सगळ्या उदाहरणांत कोणती तात्त्विकता होती.
या कोल्हापुरात माझ्यापेक्षा मोठा, सन्मानित कोणी असताच कामा नये, या अट्टहासाला आणि त्याच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला आता कोल्हापूरची सुजाण आणि सुज्ञ जनता कंटाळली आहे. मला मानपत्र मिळाल्यानंतर जणू मानपत्रच बंद झाले पाहिजे, अशा स्वरूपाची विखारी भूमिका कोल्हापूरने पाहिली नाही का? आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत मुद्रा उमटविणारे ज्येष्ठ उद्योगपती आर. एम. मोहिते यांना मानपत्र देण्यावेळी झालेला थयथयाट कोल्हापूर विसरलेले नाही.
विकासाच्या कल्पना, काम उभे करणे, हा जगन्नाथाचा रथ असतो; पण कोल्हापुरात जे काही चांगले घडले, ते माझ्यामुळेच झाले, अशी टिमकी ऐकून कोल्हापूरकरांचे कान किटले नाहीत काय? ग्रामीण भागात एक म्हण आहे, ""आबाची गाडी, बाबाची बैलं, सख्या हाकणार आणि तुक्या बसणार.'' प्रत्येक वेळी साधनं जमा करायची दुसऱ्यांनी आणि हा "तुक्या' माझ्यामुळेच सगळं झालं, असं मिरवणार. मग मुद्दा कोल्हापूरच्या विकासाचा असो की, ऊस दराच्या आंदोलनाचा. ऊस दराचे आंदोलन माझ्याच टेबलवर मिटले पाहिजे, हा अट्टहास झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे चित्र रंगविले गेले. खरोखरच शेतकऱ्यांना ठरलेला दर मिळाला काय? असला रिकामा मोठेपणा काय कामाचा?
कोल्हापूरला पुरोगामी विचारांची बैठक आहे. त्यापायी कोल्हापूरने प्रत्येक काळात लढा दिला आहे. एकीकडे ती परंपरा सांगायची आणि दुसरीकडे जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्यासारख्या अशास्त्रीय थोतांडाचे उदो उदो करायचे, हे आपण पाहिले नाही का? फार जुने सोडून द्या. हुपरीत गुप्तधनाच्या शोधासाठी शेतात भुयार खणण्याच्या वेडाचाराला "ही अंधश्रद्धा आहे' हे स्पष्टपणे दिसत असताना त्याचेही समर्थन करण्याचा प्रकार नुकताच पाहिला नाही का? पवनचक्क्यांमुळे दुष्काळ पडतो, पवनचक्क्या पाऊस पळवून लावतात, अशा शोधाला याच वृत्तपत्राने एकेकाळी गाजविले होते. शासनाने नेमलेल्या ताकवले समितीने हा मूर्खपणा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. एवढेच नव्हे तर पुढच्याच वर्षी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडविणारा धो-धो पाऊस पडला आणि पवनचक्क्यांमुळे पाऊस जातो, असले अशास्त्रीय खूळ नाचविणाऱ्यांचे पितळ उघड पडले
समाजस्वास्थ्य नावाची चीज असते आणि ती राखण्याची जबाबदारी वृत्तपत्रांचीही आहे, याचे भान अयोध्येच्या दंगलीपासून मिरजेतल्या दंगलीपर्यंत कधी तरी दिसले का? सुज्ञ आणि विचारी कोल्हापूरकराला याचे वैषम्य वाटत नाही काय?
व्यक्तिद्वेषातून अनेकांना मोडून काढणे असो की, समाजाला मागे खेचणाऱ्या विचारांचे समर्थन असो आणि हे सारे करून रोज वाचकांच्या माथ्यावर स्वतःचा मोठेपणा लादणे असो, या वाचकद्रोही भूमिकेचा ती घेणाऱ्या "पुढारी' आणि प्रतापसिंह जाधवांचा व्यक्ती किंवा संस्था म्हणून नव्हे, तर चुकीच्या गोष्टीला नकार म्हणून विरोध करायलाच हवा. "सकाळ' दंभस्फोट करतो आहे ते त्यासाठीच. यात ना स्पर्धेचा संबंध आहे, ना व्यक्तिगत आकस. आजवर सारीच साधनशूचिता गुंडाळून आम्हाला हवे तेव्हा, हवे तसे करू, हे यापुढे चालणार नाही. जी साधने समोरून वापरली जातील, त्याच साधनांनी उत्तर देण्यास "सकाळ' सज्ज आहे. "धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट', हाच विचार त्यामागे आहे. "पुढारी'पणापायी चाललेल्या या धटिंगणपणाला सामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सारे घटक कंटाळले आहेत. दबावतंत्राचा कधी ना कधी प्रत्येकाला त्रास झाला. अशा अकारण छळवाद सहन कराव्या लागणाऱ्या प्रत्येकाच्या मागे "सकाळ' ठामपणे उभा राहील. "त्या' वृत्तपत्राने विरोध केल्याने अकारण कोणी मोडून पडणार नाही, यासाठी "सकाळ'चा भक्कम आधार असेल. जाहिरात दिली नाही, अंकवाढ केली नाही, यासाठी असो, की एखादे नियमबाह्य काम नियमात बसविण्यासाठी असो, होणाऱ्या दमबाजीविरोधात "सकाळ' ठाम आणि आग्रही भूमिका घेईल. लोकांनीही आता दबावाला झुगारण्यास पुढे यावे. "सकाळ' तुमच्या पाठीशी आहे.
बांधूया बोक्याच्या गळ्यात घंटा
कोल्हापुरात वृत्तपत्राच्या बुरख्याआड अडवणूक नवी नाही. त्याचे अनुभव अनेकांनी घेतले आहेत. यात कित्येक जण होरपळले आहेत. अशा साऱ्यांना कधी तरी हे संपले पाहिजे, असे वाटते; पण बहुतेकांपुढे प्रश्न असतो "बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी?' हे सहन करणे आता बस्स झाले. दबाव झुगारून देऊया. कोणतीही दहशत अनंत काळ चालत नाही. ठामपणे उभी राहिलेली समूहशक्ती त्याचा अंत करू शकते. चला तर बोक्याच्या गळ्यात घंटा बांधूया.