बहिष्कारामागील मेंदू कुणाचा?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 11, 2010 AT 09:34 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या नव्या वर्षाची सुरवातच "सकाळ'वरील बहिष्काराने झाली. दोन जानेवारीस विक्रेते व एजंट बंधूंनी अचानक "सकाळ'वर बहिष्कार टाकला व तीन तारखेपासून "सकाळ'चा अंक वितरित करण्याचे नाकारले. त्यावेळी विक्रेत्यांची भूमिका अशी होती, की "सकाळ'च्या कोल्हापूर शहरातील अंकाची किंमत ही तीन रुपये हवी. वृत्तपत्राची किंमत किती असावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाचा असतो. त्यामध्ये इतरांनी कुणी ढवळाढवळ करू नये, अशी स्वच्छ भूमिका "सकाळ'ने घेतली व स्वतःच्या हिमतीवर चार दिवस कोल्हापूर शहरात "सकाळ'ची वितरण व्यवस्था भक्कमपणे राबविली. त्या काळात वाचकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला, तो शब्दातीत आहे. ""वाचला तर "सकाळ' नाहीतर इतर कोणतेही वृत्तपत्र उंबऱ्याच्या आत टाकायचे नाही,'' असा दमच त्याने विक्रेत्याला दिला. कित्येक वाचकांनी "सकाळ'च्या बदल्यात विक्रेत्याने टाकलेला "पुढारी'चा अंक विक्रेत्याला मागे बोलावून परत न्यायला लावला. महिनाभर संप सुरू राहिला तरी माझ्या घरी "पुढारी' किंवा अन्य दुसरे कोणतेच वृत्तपत्र टाकायचे नाही, अशी ठाम भूमिका वाचकांनी घेतली. हा "सकाळ'च्या आजपर्यंतच्या पत्रकारितेचा गौरव आहे, अशीच आमची भावना आहे. या सगळ्या गोष्टींचा दबाव आल्यानंतर विक्रेता संघटनेने सकारात्मक भूमिका घेतली. त्यावेळी विक्रेता संघटनेशी झालेल्या चर्चेत वाचकांनाही निश्चित काळासाठी "सकाळ' एक रुपयामध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले होते. विक्रेता बांधवांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय "सकाळ'ने आजपर्यंत घेतलेला नाही, हेदेखील मुद्दाम नमूद करावेसे वाटते. त्यानुसार गेले अडीच महिने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातही "सकाळ' एक रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. "सकाळ'चा अंक नव्या वाचकांच्या घराघरांत मोठ्या प्रम
ाणात गेला आहे आणि त्या वाचकांकडून "सकाळ' मनापासून स्वीकारला जात आहे. वीस पानांचा अत्यंत सुबक व दर्जेदार अंक कमी किमतीत मिळत असल्याने वाचकही खूश आहे. तशा हजारो प्रतिक्रिया "सकाळ'कडे विविध माध्यमांतून आजपर्यंत आल्या आहेत. नेमकी त्याचीच पोटदुखी झाल्याने "सकाळ'वरील बहिष्काराचे कारस्थान रचले गेले. विक्रेता संघटनेच्या आडून "पुढारी' हे उद्योग करतो, हे वेगळे सांगायची गरज नाही.
आता नव्वद पैसे कमिशन द्या, अशी मागणी घेऊन विक्रेता संघटनेने बहिष्काराचे पाऊल उचलले होते. परंतु त्याच विक्रेत्यांना हेदेखील चांगलेच माहिती आहे की तीन रुपयांच्या अंकाला ९० पैसे कमिशन स्वतःहून देणारे "सकाळ' हेच महाराष्ट्रातील एकमेव वृत्तपत्र आहे. "सकाळ'ने विक्रेत्यांमध्ये शहरी व ग्रामीण असा भेदभाव कधीच केला नाही. त्यांच्या कष्टाचे माप त्याच्या पदरात टाकण्यात "सकाळ' नेहमीच पुढे राहिला आहे. परंतु "पुढारी' मात्र थेट असा भेदभाव करतो याचीही जाणीव विक्रेते बांधवांना निश्चितच आहे. विक्रेत्यांच्या हिताचा किंवा भल्याचा विषय जेव्हा येतो, तेव्हा "सकाळ'ने दिलेला शब्द कधी पाळला नाही असे कधीच घडलेले नाही. "पुढारी'च्या बाबतीत असे अनुभव दुर्बिण घेऊन शोधावे लागतील. फार लांब जायला नको, कालचेच उदाहरण घेऊया... काल विक्रेता संघटनेचा कोल्हापुरात मेळावा झाल्यावर त्यामध्ये "सकाळ'वर बहिष्काराचा निर्णय झाला. त्यावेळी "पुढारी'च्या व्यवस्थापनाने ९० पैसे कमिशन देण्याचे जाहीर केले आणि पहाटे अंकविक्री सेंटरवर संगणकावर तयार करण्यात आलेली निवेदने लावण्यात आली. त्यामध्ये असे म्हटले आहे, की जोपर्यंत "सकाळ'वर बहिष्कार आहे अथवा "सकाळ' किंमत वाढवत नाही, तोपर्यंतच विक्रेत्यांना ९० पैसे कमिशन दिले जाईल. म्हणजे काल सायंकाळी दिलेले आश्वासन "पुढारी'चे व्यवस्थापन दिवस उजाडण्यापूर्वीच धाब्यावर बसविते आणि तेच व्यवस्थापन आज विक्रेता बांधवांच्या हिताची भाषा करत आहे म्हणजे यासारखा दुसरा विनोद नाही. रात्री उशिरापर्यंत पुन्हा नव्वद पैसे देऊ असे नवे आश्वासन देऊन "पुढारी'ने पुन्हा घूमजाव केले. तोपर्यंत विक्रेत्यांनी "सकाळ'वरचा बहिष्कार मागे घेतला. आता कमिशनबाबत नेमका कोणता शब्द "पुढारी' पाळणार हे पाहूयाच.
एक रुपया किमतीत "सकाळ' नव्या वाचकांपर्यंत पोचविण्याचे आमचे व्यावसायिक धोरणच आहे. तो "सकाळ'च्या विक्रीवृद्धी योजनेचा एक भाग आहे. अशा योजना सर्वच वृत्तपत्रे सर्वच ठिकाणी राबवितात. "पुढारी'ने जेव्हा आपली पुणे आवृत्ती सुरू केली, तेव्हा "पुढारी'ला पुण्यात येण्यास "सकाळ'ने कधीच विरोध केला नाही. परंतु "पुढारी'ने मात्र "सकाळ' कोल्हापुरात आला तेव्हा मोर्चापासून काय-काय गोष्टी केल्या, हे कोल्हापूरचा सुज्ञ माणूस विसरलेला नाही; परंतु तो विरोध मोडून "सकाळ' कोल्हापूरच्या मातीत रुजला, वाढला आणि आता तो या जिल्ह्याचे मुखपत्र बनला आहे. "पुढारी' पुण्यात गेल्यावर स्वागतमूल्याच्या नावाखाली एक रुपयातच अंक विकत होता. विशेष म्हणजे "पुढारी' पुण्यात गेल्यावर "सकाळ'ने तेथील अंकाची किंमत वाढविली. कारण "सकाळ'चा आपल्या अंकाच्या गुणवत्तेवर विश्वास होता. तिथे "सकाळ'ने विक्रेत्यांचा संप घडवून आणणे किंवा अन्य तत्सम गोष्टी कधीच केल्या नाहीत. कारण "सकाळ'चे व्यवस्थापन कोणत्याही पातळीवरील व्यावसायिक स्पर्धेला उतरायला नेहमीच तयार आहे. वाचकाला जे आवडेल, ते त्याने घ्यावे अशीच "सकाळ'ची भूमिका राहिली आहे.
पेपर म्हणजे "पुढारी' इतकी लोकप्रियता मिळाल्याचा टेंभा हे वृत्तपत्र अनेक वर्षे मिरवत आहे. त्यांच्या व्यवस्थापनाला जर गुणवत्तेबद्दल इतका विश्वास आहे, तर मग स्पर्धक वृत्तपत्रांनी किंमत कमी केल्यावर त्याची तुम्हाला भीती का वाटते? आजही "पुढारी' ठाणे ग्रामीण व रायगड जिल्ह्यामध्ये एक रुपयातच विकला जातो. पुणे व मुंबईतही "पुढारी'ला वाचकांनी स्वीकारले नाही व आता कोल्हापुरातील वर्चस्वालाही धक्का बसल्यामुळे "पुढारी'चा थयथयाट सुरू झाला आहे. "पुढारी' ठाणे व रायगड जिल्ह्यातील विक्रेत्यांना किती कमिशन देतो, याचाही कोल्हापुरातील विक्रेता बांधवांनी जरा शोध घ्यावा; परंतु त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करून "पुढारी'चे व्यवस्थापन "आम्ही ठरवू ती पूर्व दिशा' या तंत्राने व्यवहार करू लागले आहे. "सकाळ'ला जाहिरात देणाऱ्या व्यक्ती व संस्थांनाही बघून घेतो, अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. अशा गोष्टींना आता "सकाळ' भीक घालणार नाही. "सकाळ'च्या व्यवस्थापनाची भूमिका आजपर्यंत सभ्यपणाची राहिली म्हणून आम्ही कमजोर किंवा कमकुवत आहोत, असा अर्थ कुणी काढू नये. या जिल्ह्यातील सुजाण नागरिक, सजग वाचक, सामान्य माणूस यांचे "सकाळ'ला अत्यंत भरभरून पाठबळ लाभले आहे. विक्रेत्यांनी काहीही भूमिका घेतली तरीही घरोघरी अंक पोचविण्याची आमची बांधिलकी कायम आहे, असे कित्येक लोक "सकाळ'कडे स्वतःहून सांगत आहेत. हीच "सकाळ'ची सर्वांत भरभक्कम ताकद आहे, अशी आमची नम्र भावना आहे. त्या ताकदीच्या जोरावर "सकाळ' सर्व स्तरांवरच्या नव्या लढाईला सज्ज आहे, इतकाच इशारा आम्ही देत आहोत.