
नागाव - सामाजिक पायाभूत सुविधा विकासाची कोल्हापूरला गरज आहे, असे मत सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी व्यक्त केले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) येथे श्री. पवार यांनी उद्योजकांची भेट घेतली व विविध प्रश्नांवर चर्चा केली. अध्यक्षस्थानी "स्मॅक'चे अध्यक्ष पद्माकर सप्रे होते.
श्री. पवार म्हणाले, 'आपल्याकडे योग्य मार्गदर्शन नसल्याने अनेक वर्षांपासून आपण त्याच त्या समस्या शासनाकडे मांडत आहोत. त्यामुळे वर्षाला एक-दोन समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत. कोणत्या प्रकारच्या समस्या कुणाकडे मांडाव्यात याचे साधे ज्ञानही आपल्याकडे नाही. त्यामुळे न संपणाऱ्या समस्यांसाठी आपण वेळ वाय घालवत आहोत. या वेळेचा फायदा भविष्यात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी केला तर अधिक सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. परदेशात जे उद्योग प्रदूषणाच्या नावाखाली नाकारले आहेत तेच उद्योग आपण स्वीकारले. त्यामुळे आपल्याला पुढील काळात भयानक समस्यांना सामना करावा लागेल. कोणतेही कार्य करताना जनमताचा आधार घ्यावाच लागेल. त्यासाठी सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे काय आहे, याचा विचार व्हायला पाहिजे. मोठ्या उद्योगांनी कोल्हापूरला यावे यासाठी आपल्याकडे काय आहे? वरिष्ठ व्यवस्थापन व प्रशासकीय कामातील कुशल मनुष्यबळ कोल्हापुरात आहे का? आज शेतात मजूर मिळत नाही, कारखान्यात कामगार मिळत नाहीत, अशा स्थितीत मोठा उद्योग इथे आल्याने चित्र पालटेल, हा विचार चुकीचा आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. अध्यक्ष पद्माकर सप्रे यांनी औद्योगिक वसाहतीमधील विविध समस्या समजावून सांगितल्या. यावर आपल्याला शक्य ते सर्व सहकार्य करू, असे श्री. पवार यांनी सांगितले. श्री. सप्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
याप्रसंगी ज्येष्ठ उद्योगपती बापूसाहेब जाधव, तुकाराम पाटील, प्रताप पुराणिक, डी. डी. पाटील, दीपक जाधव, दीपक चौगले, पुनित गांधी, अजय सप्रे, राजू पाटील, "सकाळ'चे मुख्य व्यवस्थापक (कमर्शिअल) नंदर मिठारी, "स्मॅक'चे सचिव टी. एस. घाटगे उपस्थित होते. प्रताप पुराणिक यांनी आभार मानले.