योगेश पवार मुंबई - प्रवाशांनी खचाखच भरलेली लोकल अचानक एखाद्या स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ थांबते... रेल्वे सुरक्षा पथकाचे जवान धावत येतात आणि रेल्वेच्या टपावरून प्रवास करणाऱ्या टपोरींना खाली खेचून त्यांची बखोटी पकडतात.. गाडीतल्या प्रवाशांना काही कळण्याच्या आत अवघ्या 5 ते 7 मिनिटात ही कारवाई होते आणि लोकल पुन्हा धावू लागते.

उद्घोषणा, कारवाई, पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृतीच्या प्रयत्नांना न जुमानता टपावरून प्रवास करणाऱ्या टपोरींना पकडण्यासाठी व त्यांना अशा प्रकारे प्रवास करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 1 मार्चपासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टपावरल्या प्रवाशांना खाली उतरूनच रेल्वे पुढे चालविली जात आहे. बोरिवली स्थानकादरम्यान गेल्या दहा दिवसांत चार लोकल अशा प्रकारे स्थानकात थांबवून टपावरच्या प्रवाशांची गठडी वळण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेव्हिड यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गाचे डायरेक्ट करंट (डीसी) ऐवजी अल्टरनेट करंट (एसी) मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे ओव्हरहेड वायरमधून 25 हजार व्होल्टेज वीजपुरवठा प्रवाहित केला जात असून टपावरून प्रवास करणे अधिक घातक बनले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून एफएम रेडिओ, भित्तिपत्रके, स्थानकावरील उद्घोषणा आदी माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मात्र या साऱ्या प्रयत्नांना धूप न घालता टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारशी कमी झालेली नाही. टपावरून प्रवास करताना मृत्यू झाल्यास रेल्वे 10 ते 20 मिनिटे थांबते. प्रवाशांचा जीव आणि वेळ वाया जाऊन रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. यावर उपाय म्हणून टपावरच्या प्रवाशांना उतरवून गाडी पुढे नेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
---------------------------------------
टपावरले टपोरींवरील कारवाई
सन 2009 मध्ये - 2134
सन 2010 - 151
---------------------------------------
टपावरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर आज दुपारी टपावरून प्रवास करणाऱ्या 15 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. टपावरून प्रवास करताना
वीजभारीत ओव्हरहेड वायरचा स्पर्श त्याला झाला. या वर्षातील हा पहिला बळी आहे.
---------------------------------------