गांधीवाद नव्या पिढीपर्यंत पोचावा - गौतम बजाज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 14, 2010 AT 12:00 AM (IST)
नाशिक - नव्या पिढीला महात्मा गांधींविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे या पिढीला समजेल, रुचेल अशा भाषेत गांधीजींचे विचार पोचविणे आवश्यक आहे. त्यांचे जीवनाविषयीचे मूलभूत विचार समाजाला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन गौतम बजाज यांनी केले.
वासंती सोरलिखित "एकविसाव्या शतकात गांधी', "गोष्टी गांधीजींच्या', "सारं काही देशासाठी' या तीन पुस्तकांचे प्रकाशन आज कुसुमाग्रज स्मारकात झाले. त्या वेळी ते बोलत होते. रामभाऊ म्हसकर, गो. पु. देशपांडे, गौतमी प्रकाशनाचे निषाद देशमुख उपस्थित होते. श्री. बजाज म्हणाले, की गांधीजींना विनोबांशिवाय समजणे कठीण आहे. त्यांच्या अहिंसेच्या विचारांपेक्षा शांततेचा विचार महत्त्वाचा आहे. श्री. म्हसकर म्हणाले, की गांधींजींचे विचार सर्वदूर पोचविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक आहे. ज्ञानाच्या अभावाने मनुष्य हीन बनतो. गांधीजींच्या विचारांचा भारतात आदर होत नाही. हे विचार परदेशातून येतील तेव्हाच आपल्याला त्याचे महत्त्व पटू शकेल. गो. पु. देशपांडे म्हणाले, की अहिंसेचा विचार प्राणिकेंद्रित आहे. त्यामुळे शांततेचा विचार करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषणात गांधी येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वासंती सोर म्हणाल्या, की पुस्तकरूपाने गांधीजींचे विचार पोचविताना आनंद होत आहे. गांधी विचार, संस्कार घरातूनच मिळाल्याने पुस्तकाची प्रेरणा मिळाली. सामाजिक समस्या सोडविण्याची क्षमता या पुस्तकात आहे. या पुस्तकातून आई-वडिलांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. निषाद देशमुख यांनी आगामी प्रकाशनाविषयी माहिती दिली. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार सोर यांनी आभार मानले.