|
उस्मानाबाद -  दलित वस्तीमधील विविध विकासकामांची पूर्तता करावी, या मागणीसाठी सहा सप्टेंबर रोजी महिला बचतगटाच्या वतीने पालिकेवर लोटा मोर्चा काढण्यात येणार आहे. रसुलपुरा, भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर या दलित वस्तीमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या भागांतील विकासकामे पूर्ण करावीत, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. नागरिकांनी या संदर्भात पालिकेला निवेदनही दिले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालय ते वैरागरोडपर्यंत नऊ लाख रुपये खर्चाचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याचे पालिकेने लेखी कळविले आहे. या चारही भागांतील रस्ते, नाल्यांची कामे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात येतील, असे पालिकेने कळविले आहे. असे असले तरी महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट आहे. स्वच्छतागृहांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, त्याची चौकशी करावी. स्वच्छतागृहाच्या परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य आहे. झाडे, झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे.
Wednesday, September 01, 2010 AT 09:30 AM (IST)
|